Posted on November 5, 2021
मागच्या ब्लॉग मध्ये आपण ‘ऑक्टोबरचा आरोग्य मंत्र’ हा विषय जाणून घेतला.ऑक्टोबरच्या उन्हाळ्यात विविध प्रकारचे आजार होतात. त्यापैकी मूळव्याध हा अत्यंत त्रासदायक आणि खूप वेदनायुक्त आजार आहे.
आजचा आपला विषय आहे – मूळव्याध
पहिले जाणून घेऊया मूळव्याध हा आजार कोणाला जास्त संभवतो?
जे लोक अधिक प्रमाणात मांसाहार, तिखट पदार्थ, मसाल्याचे पदार्थ यांचे सेवन करतात आणि ज्यांना मलबद्धतेचा त्रास असतो त्या लोकांना हा आजार जास्त संभवतो.
मूळव्याध होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?
१. मलबद्धता होऊ न देणे.
२. उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी आरोग्य मंत्राचे पालन करावे.
‘ऑक्टोबरचा आरोग्य मंत्र’ आहे
“पांढरे, गोड, पानीयुक्त, नारळयुक्त आणि उकडलेल्या पदार्थाचे उन्हाळ्यात अधिक सेवन करावे. “
१. पांढरा रंग हा पित्तशामक आहे. तो शीतता प्रदान करतो. त्यामुळे पांढऱ्या रंगाचे पदार्थ हे शरीरातले पित्त संतुलित ठेवतात म्हणून पांढऱ्या रंगाचे पदार्थ अधिक खावेत जसे दूध, दूधाचे पदार्थ, तूप, लोणी, ताक. उन्हाळ्यात जेवणामधे ताकाचे खूप जास्त प्रमाणात सेवन करावे कारण ताक मूळव्याधीवर खूप गुणकारी आहे.
२.पांढऱ्या रंगाची फळे ही पित्त शमन करतात आणि पोट सुध्दा साफ ठेवतात. त्यामुळे उन्हाळ्यात पांढऱ्या रंगाच्या फळांचे अधिक सेवन करावे जसे पेरू, सफरचंद, केळी, पिअर आदि
३) हिरवी मिरची, आले, लसूण आणि मिरे हे जेवणात टाळावे. उन्हाळ्यात हिरवी मिरची कच्च्या स्वरूपात अधिक प्रमाणात खाण्यात आली जसे चटणी, पाणीपुरी मधे तर मूळव्याधीतून रक्त पडायला सुरुवात होते.
मूळव्याधीतून पडणारे रक्त कसे थांबवावे?
मूळव्याधीतून पडणारे रक्त थांबवण्यासाठी कांदा सालीसोबत गॅस वर भाजावा नंतर साल काढून नुस्ता कांद्याचे सेवन करावे किंवा कांद्याचे दहीसोबत सेवन करावे. या उपायाने मूळव्याधीतून पडणारे रक्त लगेचच थांबते.
मूळव्याध झाल्यावर काय पथ्य करावे?
१) हिरवी मिरची, आले, लसूण, मिरे यांचे सेवन पूर्णतः बंद करावे.
२) जेवणामध्ये ताकाचे प्रमाण अधिक वाढावावे.
३) आठवड्यातून २-३ वेळा सुरणाच्या भाजीचे सेवन करावे.
सुरणाची भाजी बनवण्याच्या आधी सुरण कापून ते ताकामध्ये भिजत टाकावे त्यामुळे सुरणातले क्षार ताकामध्ये विरघळतात. क्षारासोबत सुरणाच्या भाजीचे सेवन केले तर जीभ , घशाला खाज सुटणे,मुतखडा, संधिवात यासारखे आजार होण्याची संभावना असते.
जर मूळव्याधी बरोबर आपल्याला मलबद्धता असेल तर जेवणाआधी गरम पाणी किंवा गरम दुधात एक चमचा तूप किंवा एक चमचा बदाम तेल मिसळून त्याचे सेवन करावे. याने मलबद्धता जाते, गॅसेस कमी होतात आणि मूळव्याधीच्या ठिकाणी असलेली रुक्षता व आग कमी होते.
तसेच रोज सकाळ-संध्याकाळ एक चमचा त्रिफळा चूर्ण किंवा एक त्रिफळा गोळीचे उपाशीपोटी गरम पाण्यासोबत सेवन करावे.
या सर्व उपायांनी मूळव्याधीच्या त्रासापासून तुम्हाला उपशय जरूर मिळेल.
तरीही एकदा वैद्य किंवा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या आणि आयुर्वेदाच्या पंचकर्मामधील ‘क्षारसूत्र’ या विधीमुळे मूळव्याध हा मुळातून काढता येतो त्याचा उपयोग जरूर करून घ्या.
उन्हाळ्यातील विविध आजारांपासून वाचण्यासाठी ‘ऑक्टोबरचा आरोग्य मंत्र’ याचे पालन करा .
Stay Healthy Stay Blessed
Category: Marathi Blog Tagged: Aarogyam Ayurvedic Clinic, ayurveda, आरोग्य, उन्हाळा, ऑक्टोबरचा आरोग्य मंत्र, क्षार, क्षारसूत्र, चूर्ण, त्रिफळा, दूध, मंत्र, मुतखडा, मूळव्याध, लसूण, वैद्य, संधिवात, fissures, health, Healthy Eating, Healthy Living, HOW TO, immunity, milk, panchakarma, piles, summer, tips, Treasures of Ayurveda